Friday, April 15, 2011

उंबरखिंड समरभूमी स्मारक

         बऱ्याच दिवसांपासून उंबरखिंडीच्या समरभूमीला   भेट देण्याचे   घाटत  होते, परंतु काही  ना
 काही कारणामुळे होत नव्हते. अखेर सारे काही जमून आले आणि आम्ही सकाळी ७.३० वाजता उंबरखिंडीच्या दिशेने प्रयाण केले. खोपोलीच्या पुढे नाश्ता करून गाड्या   उंबरखिंडीच्या रस्त्याला लागल्या.  खोपोली पासून १०-१२ किलोमीटर गेल्यावर डाव्या हाताला समरभूमी उंबरखिंडीकडे  असा बोर्ड(फलक) दिसतो. डावीकडे गाड्या वळवल्यानंतर लगेचच GAIL चा प्लांट दिसतो. त्याच्या पूर्वेकडून व आंबा नदीच्या पश्चिम बाजूकडून जाणाऱ्या रस्त्याने  जात राहावे. २.५ ते ३.०० किलोमीटर गेल्यावर सखुची  ठाकरवाडी हे गाव लागते. गावातून सरळ पुढे जावे. अजून १ किलोमीटरनंतर उजव्या हातास नदीपात्रात उतरणारा रस्ता दिसतो व रस्त्याच्या तोंडालाच लढायीची थोडक्यात माहिती देणारा  बोर्ड(फलक) दिसतो. नदीपात्रात खडकाच्या सपाटीवर अतिशय समर्पक व सुंदर शिल्प उभारलेले आहे. उत्तरेस महाराजांची अश्वारूढ प्रतिमा कोरलेली  आहे. पूर्वेस मुद्रा आहे व लढायीचे थोडक्यात वर्णन आहे. शिल्प चौकोनी चौथऱ्यावर उभे आहे. पूर्णाकृती धनुष्य, ढाल, तलवार, व भाला या सर्व शस्त्रांचा वापर करून अतिशय देखणे व प्रसंगाला अनुरूप असे शिल्प बनविले आहे.  याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी करतलब  खान नावाच्या उझबेकी मुघल सरदाराच्या ३० हजार सैन्याचा अवघ्या १००० मावळ्यांच्या मदतीने दारूण असा संपूर्ण पराभव करून, त्यांना अंगावरील कपड्यानिशी जीवदान देवून पुण्याला पाठविले होते. या ठिकाणाची असणारी भौगोलिक रचना व तिचा महाराजांनी कुशलतेने करून घेतलेला उपयोग बारकाईने अभ्यास करण्यासारखा आहे. शत्रूला आपल्या हालचालींचा किंचितही सुगावा लागू न देता, त्याला अडचणीच्या जागी बेसावध पकडून, त्याच्यावर सर्व बाजूंनी  जोरदार आक्रमण करून गाफील अवस्थेत पकडायचे आणि आपल्या कमीत कमी नुकसानीत शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करायचे असे त्या काळाच्या अतिशय पुढचे व तोपर्यंत  फारसे कोणी न वापरलेले युद्धतंत्र महाराजांनी या लढायीत वापरले. आपला एकही मावळा जखमी न होता करतलब खानास   राजांनी या युद्धात संपूर्ण पराभूत करून त्याच्याकडून जबर खंडणी वसूल केली.  या जागेची  रचनाच अशी आहे कि शत्रू एकदा माऱ्याच्या टप्यात आला कि त्याची कमीत कमी सैन्यासह  सर्व बाजूंनी नाकेबंदी करता येते आणि एकदा त्याचा धीर खचला कि त्याला पराभूत करणे सहज शक्य होते. नदीच्या उत्तर व दक्षिणेस टेकड्या आहेत. पूर्वेस दूरवर चावनी(हा कदाचित छावणीचा अपभ्रंश असू शकतो) गाव व त्याच्या मागे सह्यादीचा खडा चढ आणि घाटावर कुरवंडे गाव, तर पश्चिमेस नदीचे पात्र आशी रचना आहे. महाराजांनी आपल्या सैन्याच्या ५०-१०० मावळ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या बनवल्या आणि मोक्याच्या प्रत्येक जागेवर त्या आधीच पेरून ठेवल्या. जोपर्यंत इशारत होऊन मराठ्यांनी हल्ला केला नाही तो पर्यंत मुघलांना तिथे मावळ्यांचे  अस्तित्वहि   जाणवणार नाही आशी काळजी राजांनी घेतली होती. संपूर्ण मोहीम हि आतिशय गुप्त होती, तसेच करतलब खानच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीची अगदी तपशीलवार माहिती महाराजांना होती. खानाच्या छावणीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची  तासा तासाची खबर राजांकडे पोहचत होती.

       हे सगळे वाचल्यावर कदाचित करतलब खान हा एखादा मूर्ख सरदार असावा आणि म्हणूनच तो असा अलगद महाराजांच्या जाळ्यात फसला असा समज होऊ शकतो. परंतु करतलब खान हा शाइस्तेखान व औरंगजेब अश्या दोघांच्याही विश्वासातला होता. त्याने फक्त बुद्धिचातुर्याने परीन्ड्यासारखा बळकट किल्ला न लढता घेतला होता, आणि कोकणात उतरतानाही त्याने त्याच्या मार्गाबाबत अतिशय गुप्तता राखली होती. त्याने तो बोरघाटातून कोकणात उतरणार अशी अफवा पसरवली होती व लोणावळ्या पर्यंतचा प्रवासही त्याने त्याचा मार्ग खरा वाटावा असाच केला होता. लोणावळ्यात त्याने अचानक आपली दिशा बदलली व त्याने उंबरखिंडीचा रस्ता पकडला. परंतु महाराजांचे हेरखाते हे अतिशय सक्षम होते.  करतलबखानाच्या प्रत्येक हालचालीची माहिती त्यांच्याकडे पोहचत होती. कुरवंडे गावापासून सुरु होणाऱ्या कुरवंड्या घाटाने  करतलबखान कोकणात उतरणार असल्याची पक्की खबर महाराजांना मिळाली व त्यांची सूत्रे वेगाने हलू  लागली. महाराजांनी राजगड सोडला व ते वाघजाई घाटाने कोकणात उतरले आणि उंबरे गावी येऊन थांबले. महाराजांनी नेताजी पालकारांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी कोरीगडाजवळील जंगलात ठेवली व तिच्याकडे खानाचा घाटातून वर येण्याचा मार्ग रोखण्याची जबाबदारी दिली. घाट उतरून आल्यावर लगेचच लागणाऱ्या चावणी गावाच्या दक्षिण व उत्तर दिशेला असणाऱ्या टेकड्या व जंगलात महाराजांचे सैन्य लपून इशारातीची वाट पाहत बसले. महाराजांनी १००० सैन्य अश्या पद्धतीने विभागले होते कि त्याची नक्की संख्या किती आहे याचा अंदाज शत्रूस येऊ नये. जेथून मारा करता येईल अशी प्रत्येक जागा महाराजांच्या सैन्याने व्यापली वे तिथे भरपूर शस्त्रात्रे व दगडगोटे जमवून ठेवले. आता फक्त खानाचे सैन्य माऱ्याच्या टप्यात येण्याची वाट पाहणे एवढेच बाकी होते. खानाने कुरवंडे गाव सोडले व तो घाट उतरू लागला. तीव्र उतार, पाताळ भासणाऱ्या दरया आणि घनदाट जंगल  यामुळे खानाचे सैन्य आधीच भयभीत झाले होते. अशातच खान चावणी गावाजवळ येताच इशारत झाली आणि सर्व बाजूकडून खानच्या सैन्यावर बाण, दगडगोटे, बंदुका, आदींचा मारा सुरु झाला.  हल्ला नक्की कुणी केला, किती लोक आहेत, कोठून वार होत आहे, अश्या कुठल्याच गोष्टीचा अंदाज खानच्या सैन्यास येईना. सुरवातीस खानाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शत्रूच्या अचानक व अचूकपणे होणाऱ्या माऱ्याने त्याचे सैन्य जखमी होवू लागले, अशातच दुपारची वेळ, पाणी नाही अशा पेचात शत्रू सापडला. घाट चढून परत वर जाने केवळ अशक्य होते. आणि कोणी तसा प्रयत्न केलाच तर वरती नेताजी पालकारांशी मुकाबला, खाली कोकणात जावे तर खुद्द महाराज समोर उभे, अश्या विचित्र अवस्थेत खानाचे सैन्य सापडले. सैन्याच्या होणाऱ्या अपरिमित हानीमुळे खानाचे सर्व सरदार खानवर खूपच वैतागले होते, परंतु तरीही खान हटण्यास तयार नाव्ह्वता. परंतु होणारी हानी पाहून  रायबागानने   खानास शरणागती पत्करण्याचा व उरलेल्या सैन्याचा जीव वाचवण्याचा सल्ला दिला. खानाचा दूत हातात पांढरे निशाण घेऊन महाराज उभे होते ती टेकडी चढू लागला. वकील पाहताच महाराजांनी त्याला खुणेनेच काय काम आहे म्हणून विचारले. वकिलाने खानाचा निरोप अतिशय नम्रपणे महाराजांना सांगितला व केवळ शाईस्तेखानाच्या आग्रहामुळे तो हे दु:सहास करू धजला, परंतु आता त्यास त्याची चूक कळली असून, प्राणाचे अभय दिल्यास तो परत जाऊ इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली. महाराजांनी  खानाकडे खंडणी मागितली व ती मिळताच सर्व सैन्याला इशारत दिली. त्याबरोबर खानच्या सैन्यावर होणारा मारा त्वरित बंद झाला. महाराजांनी घाटावर उभ्या असलेल्या नेताजी पालकरांना खानच्या सैन्याची कसून तपासणी करण्याची सूचना देण्यासाठी दूत रवाना केला. खानास आणलेला सर्व सरंजाम सोडून जाण्यास सांगण्यात आले. खानास अंगावरच्या कपड्यानिशी पुण्याकडे परतावे लागले. उत्तम नियोजन प्रभावी अंमलबजावणी, व शत्रूच्या प्रत्येक हालचालीची इत्यंभूत माहिती यांच्या बळावर महराजांनी अवघ्या १००० मावळ्यांच्या मदतीने खानच्या ३०००० सैन्याला धूळ चारली. 

या लढायीचा विशेष असा कि महाराजांनी गुप्तपणे हालचाली करण्याऱ्या शत्रूस पूर्णपणे बेसावध ठेऊन अडचणीच्या जागी बेसावध पकडले व  त्याचा संपूर्ण पराभव केला. या युद्धातून महाराजांच्या अंगी असलेल्या अलौकिक सेनापतीचे गुण साऱ्या जगाला पुन्हा एकदा समजले. मुघल सत्तेच्या एका बलाढ्य सरदारास शिवाजी सारख्या एका मामुली समजणाऱ्या जाणाऱ्या; वय, सेना, ताकद, व अनुभव अश्या सर्वच बाजूंमध्ये कमजोर मानल्या गेलेल्या माणसाने अवघ्या १००० सैन्याच्या मदतीने संपूर्ण पराभूत केले. या लढाइतून   महाराजांच्या  ठायी असणाऱ्या कुशल नेतृत्वगुणांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या लढायीची म्हणून अशी काही खास वैशिष्ठ्ये सांगता येतील.

१) शत्रू संख्या व आपले सैन्य यांचे असणारे अतिषय व्यस्त गुणोत्तर. महाराजांनी भूगोलाचा उत्तम वापर करून अफाट शत्रूस धूळ चारली.

२) शत्रूस शेवटपर्यंत आपल्या हालचालींचा सुगावा लागू न देता त्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेऊन मोक्याच्या क्षणी अचानक व सर्व ताकदीनिशी हल्ला करून त्यास परास्त करणे.
३) कमीत कमी सैन्य असूनही त्याचा अश्या खुबीने वापर करणे कि शत्रूस त्याची  संख्या कैक पटीने  वाटायला हवी.  जर महाराजाकडे  फक्त १०० हजार सैन्य आहे अशी कुणकुण जरी खानास लागली असती तरी हि लढाई दीर्घ वेळ चालणारी होऊ शकली असती.

४) राजांनी केलेली सैन्याची विभागणी व त्याची पेरणी. खानास राजांनी बुच लावलेल्या बाटलीत जसा राक्षस धरतात तसा पूर्णपणे बंद केला. त्याचे सर्व रस्ते सर्व बाजूनी बंद केले.

५) या युद्धात खरा विजय हा माराजांच्या हेर खात्याचा आहे. त्याची कामगिरी हि केवळ असामान्य अशीच आहे. हेर खाते कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण हे महाराजांचे हेर खाते असेच आहे. राजांचा आपल्या हेर खात्यावरील  दृढ विश्वास येथे दिसून येतो तसेच राजांसाठी त्यांचे हेर कशी जीवाची परवा न करता अविरत काम करत होते हेही समजते. त्याकाळी जेव्हा दळणवळण अतिशय दुष्कर होते तेव्हा महाराज अक्षरश्या वायुवेगाने आपल्या योजना पार पाडीत आणि हे केवळ आणि केवळ त्यांच्या हेर खात्यामुळे शक्य होते.
६) राजांनी शत्रू शरण आला असताही जोपर्यंत त्याच्याकडून खंडणी वसूल झाली नाही तोपर्यंत युद्ध थांबविले नाही. तसेच अनावश्यक प्राणहानीही टाळली.  वस्तुत: येथे राजांना खानच्या सैन्याची संपूर्ण कत्तल करणे सहज शक्य असतानाही राजांनी त्याला प्राणदान दिले. राजांचा उद्देश या लढाइतून केवळ लूट वसूल करणे व शाइस्तेखानास दहशत बसविणे होता. तो सध्या होताच राजांनी युद्ध थांबविले. शत्रूसहि भूतदया दाखविण्याचा  त्यांचा गुण इथे दिसतो, तसेच आपला मूळ उद्देश काय आहे हे राजे युद्धाच्या रण धुमाळीतहि विसरले नाहीत.
७) आपल्या सैन्यास राजे नेहमीच आघाडीवर राहून प्रोत्साहन देत. स्वतः राजा आघाडीवर लढतो आहे हे पाहून सामान्य सैनिकासहि १० हत्तींचे बळ येई व तो असामन्य पराक्रम गाजवण्यास उदुक्त होई.
८) राजांचा सर्वात महत्वाचा व त्यांच्या समकालीन राज्यकर्त्यांपेक्षा आतिशय उठून दिसणारा गुण म्हणजे त्यांना असणारे भूगोलाचे असाधारण ज्ञान. राजांनी त्यांच्या ताब्यातील प्रदेशाचेच नव्हे तर शत्रूच्या प्रदेशाचेही अत्यंत बारीकसारीक तपशिलासह नकाशे बनविले होते, व त्याच्या जोरावरच राजांनी आतिशय मोठ्या मोहिमा यशस्वी पार पाडल्या.

एकंदरीतच हा राजांच्या आयुष्यातील आतिशय महत्वाचा व त्यांचे कर्तुत्व उजळून टाकणारा काळ होता हे निश्चित.